Wednesday 14 May 2014

पाठबळ





आमचा एक सायाकालिंगचा छोटासा ग्रुप आहे. आदल्या दिवशी रूट ठरवून बरोबर वेळेवर नियोजित स्थळी सारे पोचतो आणि मग तास भर सायकलिंग, पोटभर गप्पा आणि घोटभर कॉफी असे उरकून घरी परततो. बुधवारी आधी ठरल्या प्रमाणे मी ५.४५ ला पोचते. समीर  आधीच आलेला आहे. आम्ही स्वारगेट कडे सायकल मारतो. तिकडे बबन ची वाट बघत असताना माझ्या लक्षात येते, अरे, पाण्याची बाटलीच राहिली आणायची. समीर पटकन म्हणतो आहे माझ्या कडे. पण एव्हाना माझ्या डोक्यात किडा वळवळतोय. आता काय? मोठा कात्रज घाट चढायचाय.
बबन येतो आणि आम्ही सायकली घाटाच्या दिशेने हाणतो. माझी नजर एखाद दुकान उघडलय का ते शोधतेय. घेता येईल पाण्याची बाटली असे मनात ठरवून पुढे जाते. सातारा रोड अजून साखर झोपेत. त्यामुळे घाट सुरु झाला तरी एकही दुकान उघडत नाही. आता मी पाण्याचा नाद सोडून देते. पण तोपर्यंत आमचे दोघे चम्पियन खूपच पुढे निघून जातात. मी सायकल दामटवते. घाटाची चढण लागल्यावर पाणी बिणी सारे विसरून पेडल मारत राहते. मोठाली वळणे पार करताना उंच डोंगर मनाला लोभवतात आणि नकळत बोगदा दिसू लागतो. इतक्यात बबन खाली उतरताना दिसतो. आणि मला पाहताच मागे फिरतो. बहुतेक मला इतका वेळ का लागला ते पाहायला आला असावा.
आम्ही बोगाद्या पाशी पोचताच मी समीरच्या बाटलीतून पाणी पिते आणि जराश्या विश्रांती नंतर तिन्ही सायकली उतरणी ला लागतात. 



माझे मन मात्र अजून पाण्यातच तरंगतंय. मी बाटली विसरले नसते तर? वाचली असती का थोडी मिनिटे? नक्कीच. खरे तर मी वर पोचल्यावरच पाणी पिते. आधे मधे थांबत देखील नाही. आणि बोगद्यापाशी मिळालेच की मला पाणी. मग का बरे इतकी गुंतले त्या क्षुल्लक पाण्याच्या बाटलीत? बहूतेक त्या पाण्याच्या बाटलीचा नुसता मानसिक आधार हवा होता मला. लागत नाही पण असलेले बरे.
मी जेव्हा प्रथम नोकरीला मुंबई ला गेले तेव्हा वडिलांनी एक कानमंत्र दिला होता. ते म्हणायचे, “अश्विनी, चार पाचशे रुपये नेहमी पर्स मधे ठेव. लागत नाहीत पण ते नुसते असण्याने बघ केवढा आत्मविश्वास वाढेल ते.” खरच कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टी सुधा खूप बळ देतात. हेल्मेट घातल्याने डोके फुटणारच नाही असे नाही. पण जरा आश्वस्त वाटते. विमा उतरवला म्हणजे वाटते काही होणार नाही आपल्याला. गाडीचे कागदपत्र जर चुकून बरोबर नसले तर नकळत नजर चुकवतो आपण पोलीसमामांची. ऑफिसचं स्वाईप कार्ड घरी राहिले तर क्षणभर वाटते घरी पाठवेल की काय सेक्युरीटी गार्ड!
मुद्दा खरे तर वस्तू विसरण्याचा नाहीच आहे. मुद्दा आहे फक्त ती जवळ असण्याने reassuring वाटाण्याचा. अशी भावनिक गुंतवणूक अगदी बालपणापासून अनुभवतो आपण.
बाळाला आईचा मायेचा हात गाढ झोपवतो. हातात धरलेले बाबांचे बोट पहिले पाऊल टाकायची हिम्मत देते. एक ऐवजी दोन शाईची पेन दप्तरातून डोकावली तर पेपर सोपा जाणारच. गाडीची पेट्रोल ची टाकी full असली की बघा गाडी कशी सुसाट धावते. मनाचे पण असेच आहे. नुसते घरी कुणी वाडीलधारे मायेचे आहे या कल्पनेनेच ते उंच भरारी घेते आकाशात. पंखांना येते बाल नुसत्या आशीर्वादाने तर कधी कधी चिमुकल्यांच्या इवल्याश्या नाजूक स्पर्शाने देखील. सगळ्यात जास्त आश्वस्त करतात ते मात्र दोन डोळे. आपल्या सख्याचे. मूक राहून आपल्याला सांगणारे.
“आहे सखे मी तुझ्या बरोबर
वाट असुदे सुंदर अथवा खडतर
आहे सखे मी तुझ्या बरोबर

सुधारस

सौ. सुधा गणेश सोवनी  त्यांना मी जेव्हा प्रथम भेटले तेव्हाच त्यांचा प्रेमात पडले.  आणि आमचे हे प्रेमाचे सुंदर नाते बघता बघता सव्वीस वर्षांचे...