Sunday 18 November 2018

सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला

मैलाचा दगड नाशिक फक्त दहा
साधारण एक महिन्यापूर्वीची रविवार सकाळ. असेच ढाक चा बहिरी वर गिर्यारोहण करत असताना आम्ही ठरवून टाकले की काहीही झाले तरी दिवाळी नंतरच्या शनिवार-रविवारी पुण्याहून सायकलवर नाशिक गाठायचे. मग काय सारी जुळवाजुळव सुरु झाली. आम्ही लागलो मग  आनंद यात्रेच्या तयारीला.

सायकली तयार झाल्या, मार्गावरील टप्पे ठरले आणि वाटेत मदत लागली तर म्हणून टेम्पो देखील निश्चित केला. काही गळाले आणि काही मिळाले असे करत आमचा  आठ जणांचा कंपू तयार झाला देखील. 

सुरुवातीचा एक क्षण
१० नोव्हेंबरची  पहाट उजाडली आणि चंदनचा फोन किणकिणला. सचीनने सेल्फी टाकून आपण उठल्याचा पुरावा दिला होता. चला सुरुवात तर चांगली झाली असे म्हणत आम्ही पहाटे साडेचार वाजता फर्ग्युसन रस्त्यावर जमलो देखील. सुरुवातीची सायकलींची किरकोळ जुळवाजुळव झाल्यावर आमचे पाय पेडल वर स्थिरावले आणि चाके फिरू लागली. मुंबई पुणे रस्त्यावर सचिनची आरोळी ऐकल्यावर हायसे वाटले. तो टेम्पोत सायकल टाकून खुशाल बसला होता. आम्हाला पाहिल्यावर त्याने सायकल उतरवली आणि आमची सफर ख-या अर्थाने सुरु झाली. बघता बघता नाशिक फाटा आला आणि गेला. आम्ही चाकणला कधी पोचलो ते कळले देखील नाही. काही वेळात तिमिराचे साम्राज्य संपून सा-या दिशा उजळल्या. आमचा वेग वाढला आणि उत्साह देखील द्विगुणीत झाला. थोड्याच वेळात अवसरीच्या घाटात आम्ही सायकली दामटवू लागलो. अतिशय मोहक सकाळ होती ती. उन्हाच्या आत घाटमाथा सर केल्यामुळे विशेष खुशीत येऊन आम्ही उदरभरणाची सोय केली. 

एव्हाना आम्हाला मोठ्या चौपदरी रस्त्याची सवय होऊ लागली होती. डोंगरमाथ्यावरचा गार वारा खाऊन मने सुखावली होती. इतक्यात परत अचानक छोट्या दुपदरी रस्त्यावर आम्ही फेकले गेलो. शार्दुल आणि द्रुमिल अगदी सहजपणे सगळ्यांच्या पुढे सायकल दामटवत  होते. या तरुणाईचा जोश पाहून आमच्या सायकली देखील आपोपाप गतिमान होत होत्या. आता मागील वाहनांची वर्दळ जाणवू लागली होती. मी मागचे दिसण्यासाठी लावलेल्या आरशात पहात सावधपणे सायकल हाकत होते. माझ्या मागे अगदी कोरी करकरीत चासी घेऊन एक ट्रक चालक येत होता. मी थोडी बाजूला सरकण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण माझ्या ध्यानात आले की त्या ट्रक चालकाला अजिबात घाई नाहीये तो माझ्या मागून अगदी सुरक्षित अंतर ठेवून सय्यमाने ट्रक चालवत राहिला. रस्ता जरा मोठा झाला आणि तो माझ्या शेजारून पुढे जाऊ लागला. मी त्याला जमेल तसे अभिवादन केले. आणि काय आश्चर्य त्याने थोडे पुढे जाऊन गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मला हात जोडून नमस्कार केला. अगदी छोटासा प्रसंग पण मनाला भिडला आणि मनातल्या सुखाला देखील. 

नारायणगाव चे आगत्य
असेच थोडे पुढे जातोय इतक्यात आम्हाला काही सायकल स्वार दिसले. सगळ्यांनी एकाच प्रकारची जर्सी घातली होती त्यामुळे लांबवरून देखील ते उत्कंठा वाढवत होते. जवळ गेल्यावर समजले की ते काश्मीर ते कन्याकुमारी अशा प्रवासाचा सराव करत आहेत. दरम्यान हेमंतशी त्यांच्याशी  बरेच बोलणे झाले होते. ही मंडळी डिसेंबर महिन्यात प्रवासाला निघणार होती. त्यांनी दररोज साधारण १४० किलोमीटरचे अंतर सायकलीवरून कापत साधारण एक महिन्यात हा प्रवास संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरावासाठी ते शिर्डीला निघाले होते. त्यांच्याशी बोलल्यावर सगळ्यांच्याच अंगात उत्साहाचे भरते आले आणि आम्ही नारायणगावाच्या जवळ पोचलो देखील. मी आणि अशोक आता मागे पुढेच होतो. गावातील भर दुपारची रहदारीची वेळ होती. आम्ही दोघे गर्दीतून वाट काढत बस डेपो पाशी पोचलो. श्रीराज या मसाला दुधाच्या दुकानात पुढे पोचलेले सायकल स्वार बसलेले दिसले आणि आम्ही आमच्या सायकली तेथे वळवल्या. सगळ्यांची नीर-क्षीर  क्षुधाशांती होते न होते तोच, दुकानाचे मालक सुनीलभाऊ इचके स्वतः आमच्या समोर उभे ठाकले. आमची विचारपूस करून ते म्हणाले की त्यांचा १२५ लोकांचा एक गट आज शिर्डीला सायकलने जाणार आहे. नारायणगाव सारख्या छोट्या गावातून देखील इतके सायकल प्रवासी निघू शकतात हे कौतुकास्पदच. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्यावर चांदनने बिल देण्यासाठी खिशात हात घातला परंतु श्रीराजच्या मालकांनी  स्पष्ट नकार दिला आणि म्हणाले सायकलीस्टकडून ते कधीच पैसे घेत नाहीत.

सचिन : विजयी वीर
श्रीराजच्या पाहुणचाराने सुखावून त्यांनीच सुचवलेल्या बोटा या गावानजीक आम्ही केव्हा पोचलो ते आम्हाला काळले देखील नाही. बाराचे उन डोक्यावर तळपत असतानाच आम्ही सरोज  या उपाहारगृहाच्या दारात पोचलो देखील. सायकली व्यवस्थित लाऊन आणि मातीने भरलेली तोंडे धुऊन आम्ही जेवणावर यथेच्च ताव मारला. आता डोक्यावरचे पत्रे देखील सुखावह वाटू लागले आम्हाला. आमचा पुढचा प्रवास चार वाजता उन्हे उतरल्यावरच सुरु होणार होता. त्यामुळे जेवणे झाल्यावर जरा आराम करण्यासाठी कुठे अंग टाकता येते का ते आम्ही आजमावत होतो. इतक्यात उपाहारगृहाचे  मालक श्री. जटार म्हणाले  की पलीकडे खाटा आहेत त्यावर विश्रांती घ्या घटकाभर. अगदी मनकवडा असावा हा मनुष्य असे म्हणत आम्ही सारे पहुडलो देखील. एकमेकांचे अनुभव ऐकत आणि छोटीशी डुलकी काढून उन्हे उतरण्याची आम्ही वाट पाहू लागलो. त्या क्षणी जर कोणी आम्हाला विचारले असते की स्वर्गीय सुख म्हणजे काय तर सगळ्यांनी एक मुखाने उत्तर दिले असते, आता अनुभवतो आहोत तेच, दुसरे काय?
चार वाजता परत सायकल वर स्वार  होऊन आम्ही संगमनेर कडे वाटचाल सुरु केली. चढ उतारांचा रस्ता पार करत चंदनापुरी घाटाच्या मार्गावर कधी पोचलो ते समजलेच नाही. शेखरच्या शाब्दिक कोट्यांना आता उधाण आलं होतं आमचा हा अनोखा सायकल प्रवास निम्यावर येऊन पोचला होता त्यामुळे सुखाचा हिंदोळा मनाला झोके देत होता. अशाच प्रसन्न वातावरणात आम्ही संगमनेर पाशी पोचलो देखील. पंचवटी हॉटेल चा पत्ता शोधून  सायंकाळी ७.३० ला आम्ही हॉटेलच्या दारात पोचलो तेव्हा मनात आनंद मावत नव्हता. सारे आपापल्या खोल्यांमध्ये पांगले. काही मिनिटांमध्ये चंदनला स्वागतकक्षातून फोन आला, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहे. आम्ही पुणेरी शिष्ट पणाने म्हणालो की आमच्या येथे कोणीही ओळखीचे नाही त्यामुळे त्यांना विचारा की त्यांना नक्की आम्हाला भेटायचे आहे का? इतके झाल्यावर आम्हाला राहवेना आणि मग अगदी सेलेब्रिटीच्या ऐटीत आम्ही खाली उतरलो. स्वप्नील  आमची वाटच पहात होते. त्यांच्या बोलण्यातून मग सारा उलगडा झाला. एका दुचाकीस्वाराने संगमनेर मध्ये शिरता शिरता सचिनची विचारपूस केली होती.  हे गृहस्थ म्हणजे डॉ. सोमण. त्यांना आठ जण पुण्याहून सायकल हाणत आले आहेत याचे कौतुक वाटले आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सायकल ग्रुप वर ही माहिती पाठवली आणि आमच्या पाठोपाठ स्वप्नील   हॉटेलवर येऊन पोचले. स्वप्नील पुण्याचेच रहिवासी परंतु दिवाळीसाठी आई वडलांकडे आले होते. ते स्वतः उत्तम सायकलीस्ट असल्यामुळे अत्यंत आत्मीयतेने त्यांनी आमची चौकशी केली. आणि उद्या सकाळी भेटू असे सांगून आमचा निरोप घेतला. 

आमची टीम निलेश आणि स्वप्नील बरोबर : संगमनेर सोडताना
दुस-या दिवशी सकाळी आम्ही तयार होऊन मार्गस्थ होतो न होतो तोच स्वप्नीलने   अचानक सायकल वरून आम्हाला गाठले. त्यांच्या बरोबर त्याचा मित्र निलेश देखील आम्हाला सामोरा आला. आता मात्र आम्हाला खरोखरच कोणी सेलिब्रिटी असल्यासारखे वाटायला लागले. त्या दोघांनी आम्हाला पुढील रस्ता समजावून दिला आणि आता फक्त उतारच लागणार अशी हमी दिली. त्यांच्या आश्वासक शब्दांनी आम्हाला आणखी जोम आला आणि झुंजूमुंजू होता होता आम्ही पुढच्या टप्प्याला पोचलो देखील.

नाशिक मध्ये आगमन
आता नाशिक अगदी २० किलोमीटर राहिलं होतं. सगळ्यांचे डोळे मैलाच्या प्रत्येक दगडावर स्थिरावत होते. अखेर आम्हाला नाशिकमध्ये स्वागत असा फलक दिसला आणि डोळ्याचे पारणे फिटले. आम्ही तपोवनाच्या रस्त्याला लागलो आणि सचिनचा मित्र जयपाल जमादार आमच्या स्वागताला उभा असलेला दिसला. त्याच्या पाठोपाठ आम्ही त्याच्या इमारतीत घुसलो. त्याने गुलाबाची फुले देऊन आमचे स्वागत केले. आमच्या विजयाच्या जयघोषात सारा परिसर दुमदुमला. 

दोन दिवसाची, दोन चाकांवरची दोनशे किलोमीटरची ही आनंद यात्रा आता समारोपाच्या अखेरच्या
डावीकडून : अशोक, शार्दुल, शेखर, चंदन, हेमंत, अश्विनी, द्रुमिल, सचिन आणि जयपाल
टप्प्यावर आली होती. आमच्या सायकली कृतार्थपणे टेम्पो मध्ये विराजमान झाल्या. आमची मने मात्र सुखाच्या परमोच्च शिखरावर पोचली होती. आम्ही सायकल प्रवासाचा हा अनवट मार्ग स्वीकारला आणि या मार्गावर आम्हाला अनेक सुखद अनुभव येत गेले. 

कोणी आम्हाला मसाला दुध पाजलं  तर कोणी जेवल्यावर विश्रातीसाठी जागा दिली. कुणी रस्त्यावर स्वतःचा खोळंबा  झाला तरी मोठ्या मनाने आम्हाला पुढे जाऊ दिल तर कोणी आमची स्वतः येऊन विचारपूस केली. एकंदर काय, सुखाच्या या प्रवासात अनेक जण दोन पावले चालले आणि आमचा आनंद द्विगुणीत केला. अगदी तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात ते सार्थ झाल,
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे.......

Wednesday 10 October 2018

त्या दोघी


त्या दोघी माझ्या अगदी जवळच्या आणि जिव्हाळ्याच्या. माझ्या दोन आज्या. एक त्या मोठ्याई म्हणजे शांताबाई माधव दांडेकर आणि दुसरी ती मोठ्याई म्हणजे मालती हरी भाटे. दोघीही मोठ्याईच ( खरे तर मोठी आई). पणत्याआणितीच्या संबोधन स्पर्शामुळे काहीश्या वलयांकित वाटणा-या आणि एकमेकींना अगदी समांतर. आम्हा नातवंडांच्या दृष्टीने दोन धृवांवरच्या भिन्न व्यक्ती.

त्या मोठ्याईंचा अर्थातच मान मोठा. वयाने मोठ्या म्हणून आणि अत्यंत विद्वान आणि भारदस्त व्यक्तिमत्व म्हणूनही. आदरयुक्त दुरावाच होता आमच्यात आणि त्यांच्यात. सहवासदेखील फारसा लाभला नाही त्यांच्या बरोबर म्हणूनही असेल कदाचित. त्या होत्याही तशाच अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या. त्या मोठ्याई म्हणजे माझ्या वडिलांच्या आई. म्हणजे माझी आजी. तेव्हा प्रतिष्ठित गर्भश्रीमंत कुटुंबांमध्ये आजी असे संबोधता मोठ्याई असे म्हणायची प्रथा होती बहुधा

कै. शांताबाई माधव दांडेकर (आमच्या मोठ्याई)
माझ्या आजवरच्या आयुष्यात मी पाहिलेली ही सर्वात सुंदर स्त्री. संगमरवरी गोरा रंग, निळेशार डोळे, धारदार नाक आणि पातळ गुलाबी ओठ आशी ही लावण्यवती दांडेकरांची गृहलक्ष्मी. आमच्या लहानपणी मोठ्याईंचा सहवास तसा कमीच लाभला. पालघरच्या बंगल्यावर मी त्यांना पत्त्यांचा सिक्वेन्स लावताना पाहिलेय नाही तर हार्मोनियम वर एखादे पद वाजवताना पाहिलंय. माझी मोठी बहिण अनघा. तिने तर त्यांना कॅराम खेळताना आणि प्रतिस्पर्ध्याला लीलया हरवताना पाहिलंय. त्यांच्यावर विधात्याने जशी सौंदर्याची पखरण केली होती तसाच डोक्यावर विद्येचा वरदहस्त देखील ठेवला होता. Beauty with brains म्हणतात ना ते अगदी सार्थ वाटत त्यांच्या बाबतीत. स्वातंत्र्यपूर्व काळात त्या हिंदी कोविद म्हणजे आताच्या एम झाल्या होत्या. हर्मोनियम उत्कृष्ठ वाजवायच्या, शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड, वाचन अफाट होते तसच अनेक कलांची आवड होती. बाबा आजोबा गेल्यावर त्या पंचवीस एक वर्षे एकाकी होत्या. फिक्या रंगाची नऊवारी साडी, गळ्यात मोत्याची माळ हातात एक एक बांगडी आणि घड्याळ असा साधाच पेहराव असायचा त्यांचा, बाबा आजोबा गेल्यावर. त्यांच्यापाशी क्रोशाने विणलेला एक बटवा असायचा, गोल आकाराचा. तसा बटवा मला वाटत मी परत कधीच कुठे नाही पाहिला.

व्यक्तिमत्व इतक भारदस्त की समोरचा माणूस भारावून गेला नाही तर नवलच. एकदा त्या बेळगावला आमच्याकडे महिनाभरासाठी रहायला येणार  असे कळले. आम्हा मुलांना आई दादांनी बरेच dos and don’ts सांगितले. त्यात आचारटपणा करायचा नाही, त्या तुम्ही असलेल्या खोलीत आल्या तर उठून उभे राहायचे, आमच्याशी बरोबरी करता ते ठीक आहे पण त्यांच्याशी मर्यादेने वागायचे अशा असंख्य सूचना होत्या. आम्ही मुले तर वैतागलोच होतो.
त्या बेळगावला आल्यावर पहिले काही दिवस आम्ही थोडे बुजल्या सारखे वागायचो पण हळूहळू सरावलो त्यांच्या असण्याला. आणि मग थोड अप्रूपही वाटायला लागल त्यांच्या सहवासाच. हार्मोनियम वर फिरणारी त्यांची ती लांबसडक बोटं, गंजिफा सारखा अवघड खेळ लीलया खेळण्याची त्यांची बुद्धिमत्ता, अनेक पुस्तके वाचून त्यावर त्यांनी लिहिलेलं समीक्षण सारच अद्भुत होत आमच्या साठी

आम्हाला पानात वाढलेलं मुकाट्याने खा असे सांगणारी आमची दुर्गामाता ( आई) मोठ्याईंसमोर अदबीने उभी राहून विचारायची आज भाजी कुठली करायची?” तेव्हा आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटायच्या. तेव्हा त्या आधाराशिवाय चालू शकायच्या तरीही जरा पायरी आली की मी आणि ताई त्यांचा हात धरण्यासाठी उगाचच चढाओढ करायचो. कारण त्यांचा मऊ मऊ हात हातात घेण्याच अप्रूप वाटायचं. अत्यंत सुस्वरूप, करारी, बुद्धिमान आणि तेजस्वी अस हे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या त्या मोठ्याई

याच्या अगदी विरुद्ध अशीती मोठ्याईम्हणजे आईची आई. साधी सुधी गव्हाळ वर्णाची, सात्विक चेह-याची मध्यम उंचीची आणि काटक बांध्याची ही आजी आमच्या बरोबरीची वाटायची. ती अचानक कधीही धुमकेतू सारखी प्रकट व्हायची. तिला पाहिले की आम्ही तिघे प्रचंड खुश व्हायचो. वाडीत असताना तर आम्ही तिघे तिची वाटच पहात असायचो. त्या काळात एकटीने प्रवास करणा-या स्त्रिया तशा विरळाच. त्यामुळे आम्हाला ती झाशीची राणी वगैरे वाटायची. भाऊ आजोबा गेल्यावर ती सदैव पांढरी साडी चोळी नेसायची. आणि वर्षाला फक्त दोनच साड्या घ्यायची. चुकून तिसरी झाली तर कुणा गरजूला दान करून टाकायची.  रामदास स्वामींवर अतीव श्रद्धा असल्यामुळे वर्षातले आठ दहा महिने सज्जनगडावरच वास्तव्य करायची. काही वर्षांनी तिने नर्मदा परिक्रमा केली तीही अनवाणी आणि सदावर्त मागून. अतिशय कष्टप्रद आशी ही परिक्रमा करून आल्यावर तिने तिच्या या अद्भुत प्रवासाची वर्णने वाचायला दिली होती आम्हाला

कै. मालती हरी भाटे (आमची मोठ्याई)
आम्हा नातवंडांशी तिचे विशेष गुळपीठ होतं. केळीच्या बागेत बसून तिच्याकडून ऐकलेल्या विविध देवादिकांच्या गोष्टी, आरत्या आणि श्लोक आजही आठवतात. ती येताना एक झोळीवजा पिशवी घेऊन यायची. या पोतडीतून मग, श्रीखंडाच्या गोळ्या, कुठल्या कुठल्या देवांचे अंगारे, लाडू, शेव गाठी सारखा इतर खाऊ, गंडे अश्या विविध गोष्टी बाहेर पडू लागायच्या.  ती आली की आईला स्वयंपाकघरात मदत करायची, आमच्या डोक्याला तेल मालिश करायची, आम्हाला खाऊ द्यायची, वाडीत आमच्या बरोबर हुंदडायची आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टी सांगायची. अजित तिचा विशेष लाडका आहे अशी आम्ही दोघींनी तक्रार केली की मग ती आम्हाला दटावायची अगं एकुलता एक नातू आहे तो माझा. अशी ही मोठ्याई स्वातंत्र्यसैनिक होती. गांधीजींच नाव काढाल की भरून यायचं तिला. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी भाऊ आजोबा तुरुंगात असताना तिने घराचा सारा कारभार एकटीने सांभाळला होता. काडी काडी एकत्र करून मोठा डोलारा उभा केला होता तिने. तिची अखंड भ्रमंती सुरु असायची आणि तिथल्या हकीकती आम्हाला समरसून सांगायची

एकदा आम्ही पनवेलला आजोळी गेलो होतो. मोठ्याईच्या मनात आले की अनायसे आपली नातवंडे आलीच आहेत तर त्यांना इतर नातेवाईकांकडे घेऊन जावू. मग काय तिने अचानक आम्हा तिघांची मोट वळली आणि निघाली खालापूरला (पेण-खोपोली रस्त्यावरचे गाव) तेव्हा आतासारख्या वाहतुकीच्या सोई नव्हत्या त्यामुळे मग आम्ही आधी एस. टी. आणि मग चक्क ट्रक ने प्रवास करून खालापूरला पोचलो. काही दिवसातच ही बातमी पालघरला पोचली. मग आईचा अर्थातच मोठ्याईशी वाद. मोठ्याईचे आपले एकच पालुपद. असुदेत तुझी मुले मोठ्या लाडाची पण त्यांना सगळ्याची सवय व्हायला हवी. आईला घराण्याच्या वलयाची भीती असावी पण खरे तर आम्हाला खरच मजा आली होती ट्रक च्या हौद्यातून जायला

मोठ्याई नऊवारी नेसून दोन्हीकडे पाय टाकून माझ्या गाडीवर बसली की माझा उर अभिमानाने भरून यायचा. तिला हिंदी किंवा इंग्रजी का ठो येत नव्हते पण भारत भ्रमण करायची ती. लहर आली म्हणून आणि नर्मदा परिक्रमा केली म्हणून, नर्मदेच्या काठी कर्नाली नावाच्या नितांत सुंदर गावात एकटी जाऊन राहिली होती काही वर्षे.  तिथे देखील स्वताःची ओळख बनवली. प्रचंड समाजकार्य केलं तिने निरपेक्ष वृत्तीने. 

अशी ही मोठ्याई, साधी सोज्वळ, पापभिरू, प्रेमळ आणि कष्टाळू

त्या मोठ्याई आणि ती मोठ्याई या खरेम्हणजे एका पिढीचा परिघच. या दोघी म्हणजे त्याच्या वेळच्या  सा-या स्त्रीवर्गाचा  आलेख. अगदी सर्वसमावेशक आलेख. एक राजवैभव उपभोगलेल्या, गर्भश्रीमंत, उच्चविद्याविभूषित, कर्तव्यतत्पर, अभिरुची संपन्न आणि करारी.  तर दुसरी काहीशी कर्मठ, देवभोळी, प्रेमळ, कष्टाळू, सहनशील आणि सर्वसमावेशक.  दोघीही आपापल्या जागी श्रेष्ठच. अगदी एकमेकींच्या विरुद्ध. कधीही एकत्र येऊ  शकणा-या दोन समांतर रेघा. पण त्या दोघींच्या नकळत त्यांनी घडवलेली आम्ही त्यांची तीन नातवंडे. दोघींमधले  काही ना काही तरी कणभर का होईना आमच्यात नक्कीच सामावले असणार आणि नकळत आम्ही त्याना आमच्यात एकत्र आणले असणारच की. त्या असतील जगल्या अगदी समांतर आयुष्ये पण शेवटी त्यांच्या नकळत त्यांच्या तिस-या पिढीने आपल्या मनात त्यांची एकत्र प्रतिमा साठवली त्या आणि ती गाळून क्त मोठ्याईची. समांतर व्यक्तीमत्वांची एकरूप प्रतिमा. ‘मोठ्याई’.

सुधारस

सौ. सुधा गणेश सोवनी  त्यांना मी जेव्हा प्रथम भेटले तेव्हाच त्यांचा प्रेमात पडले.  आणि आमचे हे प्रेमाचे सुंदर नाते बघता बघता सव्वीस वर्षांचे...